ईयो. 20. नंतर सोफर नामाथी उत्तर देऊन म्हणाला, “माझे विचार मला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. कारण त्याबद्दलची काळजी माझ्या मनात आहे. तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस, परंतु उत्तर कसे द्यायचे ते माझे मन मला शिकवते जी माझ्या समजण्यापलीकडे आहे. तुला हे सत्य प्राचीन काळापासुन माहीती आहे, जेव्हा देवाने मनुष्याची स्थापना पृथ्वीवर केली, तेव्हा पासून, दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो. त्याचा माहातम्य गगनाला जाऊन भिडेल, आणि त्याचे मस्तक ढगांपर्यंत पोहोचू शकेल. परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल. जे लोक त्यास ओळखतात ते विचारतील, ‘तो कुठे गेला?’ तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्यास घालवून देण्यात येईल आणि एखाद्या रात्रीच्या स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल. ज्या लोकांनी त्यास पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही. त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही, दुष्ट मनुष्याने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. दुष्ट मनुष्याचे स्वत:चे हातच त्याची संपत्ती परत करतील. तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती. परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल. दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो. दुष्ट मनुष्यास वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. तो त्या आपल्या तोंडात ठेवतो. परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्पाच्या विषासारखे जहर होईल. त्याने धन गिळले तरी तो ती ओकून टाकील, देव त्यास ती पोटातून ओकायला भाग पाडेल. तो फुरशाचे विष चोखील, सर्पाचा दंशच त्यास मारुन टाकील. नंतर मधाने आणि दुधाने भरुन वाहाणाऱ्या नद्या बघण्याचे सौख्य तो अनुभवू शकणार नाही. त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्यास मिळणार नाही. कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यांनी बळकावली. कारण त्यास माहीती आहे त्यास कोणतेच समाधान नसते. म्हणून त्यास आपल्या कोणत्याही गोष्टीविषयी निभावून जाता येणार नाही. तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही. त्याचे यश टिकणार नाही. जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटानी दबून जाईल. गरीबीमध्ये असणाऱ्यांचे हात त्याच्यावर येतील. दुष्ट मनुष्याने त्यास हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल. देव दुष्टावर त्याच्या शिक्षेचा पाऊस पाडेल. दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन. पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे पित्ताशय भेदील आणि तो भयभीत होईल. त्याच्या खजिन्यावर पूर्ण कोळोख येईल. मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्नी त्याचा नाश करेल. त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल. आकाश त्याचा अधर्म प्रकट करील, पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल. पुराने त्याच्या घरातील संपत्ती नष्ट होईल, देवाच्या क्रोधाच्या दिवशी त्याची संपत्ती वाहून जाईल. देवाकडून नेमलेला हा दुष्टमनुष्याचा वाटा आहे, देवाने ठेवलेले हे त्याचे वतन आहे.”