ईयो. 22. मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला, “देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय? तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय? तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो आणि तुला न्यायाकडे नेतो का? तुझे पाप मोठे नाही काय? तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना? तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले, उघड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली. तू थकलेल्यास पाणी दिले नाही आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही. जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भूमी तुझी असेल, जरी तू एक सन्मानीत मनुष्य असशील. तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, पोरक्याचे बाहू मोडले असशील. म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस. म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस. देव उंच स्वर्गात नाही काय? तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत. आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे? दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो. दाट ढग त्यास झाकत आहेत, म्हणजे त्याने आपल्याला बघू नये. तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, ज्यावर दुष्टजण चालले. त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला. जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा तो सर्वशक्तिमान देव आम्हास काय करु शकतो?’ आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दूर आहे. धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. निर्दोष त्यांचा उपहास करतात. आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे. तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील. मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्विकार कर. त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव. तू सर्वशक्तिमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल. जर तू अधार्मीकता आपल्या तंबूपासून दूर ठेवशील. तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफीरच्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत देशील. म्हणजे सर्वशक्तिमान देवच तुझे धन असा होईल आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल. तेव्हा तू सर्वशक्तिमानच्या ठायी आनंद पावशील, तू तुझे मुख देवाकडे वर करशील. तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील. जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल. देव गर्वीष्ठांना नम्र करील, आणि तो नम्र लोंकाची सुटका करील. जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.”