प्रेषि. 15. तेव्हा काही जणानी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, मोशेने लावून दिलेल्या नियमाप्रमाणे तुमची सुंता झाल्याशिवाय तुमचे तारण होणे शक्य नाही. तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर लोकांनी या वादाविषयी यरूशलेम शहरामधील प्रेषित व वडील ह्यांच्याकडे जावे. मग मंडळीने त्यांना पाठवल्यावर ते फेनीके व शोमरोन या शहरामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले. नंतर ते यरूशलेम शहरास आल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले, तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे केले ते त्यांनी सांगितले. तरीही परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे असे म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे. मग प्रेषित व वडीलवर्ग या प्रकरणाचा विचार करावयास जमले. तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली. आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असतांना जे जोखड आपले पूर्वज व आपण वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालू तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्यांच्याप्रमाणेच आपले तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. तेव्हा सर्व लोक गप्प राहीले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अद्भूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला; बंधुजनहो, माझे ऐका. परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो, असा शास्त्रलेख आहे की, ह्यानंतर मी परत येईन व दावीदाचा पडलेला मंडप पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन, ह्यासाठी की, शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा. हे जे त्यास युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये; तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्याच्यापासून तुम्ही अलिप्त असा. कारण प्राचीन काळापासून प्रत्येक शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरांत आहेत. तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले. त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः “अंत्युखिया, सिरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग या बंधुजनांचा सलाम. आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते. म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य वाटले की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेले माणसे तुम्हाकडे पाठवावी. ह्याकरिता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः या गोष्टी तुम्हास तोंडी सांगतील. कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हास योग्य वाटले: त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल, क्षेमकुशल असो.” त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला. यहूदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले. तेथे ते काही दिवस राहील्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. परंतु सिलाला तेथे आणखी रहावयास बरे वाटले. आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व सुवार्तेची घोषणा करीत अंत्युखियास राहीले. मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हणले “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनांची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.” बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे. परंतु पौलाला वाटले की, पंफुलियाहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्यास सोबतील घेणे योग्य नाही. ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला; पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्यास प्रभूच्या कृपेवर सोपविल्यावर तो तेथून निघाला. आणि मंडळयाना स्थैर्य देत सिरीया व किलिकिया ह्यामधुन गेला.