इब्री. 3. म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहोत, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा महायाजक आहे. देवाच्या संपूर्ण घराण्यात जसा मोशे देवाशी विश्वासू होता तसा ज्या देवाने त्यास प्रेषित व महायाजक म्हणून नेमले त्याच्याशी तो विश्वासू होता. ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाऱ्याला अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला. कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण सर्वकाही देवाने बांधलेले आहे. देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देवाच्या गोष्टी पुढील काळात ज्या होणार होत्या, त्याविषयी त्याने लोकांस साक्ष दिली. परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे. म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली, जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.” त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि मी म्हणालो, “या लोकांच्या अंतःकरणात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांनी माझे मार्ग कधीही जाणले नाहीत.” म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, “हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.” बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत. कारण जर आपण आपला आरंभीचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत. पवित्र शास्त्रात असे म्हणले आहे; “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुध्द बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने मिसर देशातून बाहेर नेले होते? आणि तो कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती. कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय? ह्यावरून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.